# - संक्रांत विशेष भोगीची भाजी. - #
महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. पौष महिन्यातील थंडी, नुकतीच झालेली वेळ अमावास्या आणि शेतातील नवीन पिके या पाश्र्वभूमीवर संक्रांती सणातील खाद्यजीवन महत्त्वपूर्ण ठरते. शिशिर ऋतूत स्निग्ध पदार्थ आणि शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा असा संकेत आहे. तीळ, गूळ, खसखस, सुके खोबरे, शेंगदाणा या सर्व स्निग्ध पदार्थाचा भरपूर वापर केलेले तीळाचे लाडू, तिळाच्या वडय़ा, गूळपोळीचा नेवैद्य असतो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.
संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनलाय. त्याचा अर्थ खाणे, भोगणे. या दिवशी दुपारच्या जेवणात तीळ लावून केलेली गरमागरम टम्म फुगलेली बाजरीची भाकरी, मिरचीचा खर्डा, जळगावी वांग्याचे भरीत आणि भोगीची भाजी म्हणजे सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा गावरान फक्कड बेत असतो. दुपारी एवढे साग्रसंगीत जेवण झाल्यामुळे रात्री मुगाची खिचडी, दही असा साधा बेत असतो. अनेक घरात भोगीला या सर्वाबरोबर खिरीचाही नैवेद्य दाखवतात.
संक्रांतीला गूळपोळीचा नैवेद्य असतो. या दिवशी स्त्रिया मृत्तिका घटाचे वाण देतात. वाण देण्याच्या सुगडात नुकतेच आलेले ताजे कोवळे हरभरे, मटार, तुरीचे दाणे, गाजर, उसाचे करवे, बोरे, मूगडाळ, तांदूळ आणि तिळगूळ-हलवा असे पदार्थ दिले जातात.
मुंबईतल्या हवेमध्ये कधी नव्हे तो छान गारवा पडलाय. अगदी कडाक्याची नसल्यामुळे ही गुलाबी थंडी मस्त एन्जॉयही करता येते. यावेळी न्यू इयरचं स्वागतचं जणू काही काहीशा गारठलेल्या अवस्थेत करायची आयती संधी मुंबईकरांना मिळाली. आता तर जानेवारी महिना सुरू व्हायचा अवकाश की संक्रांतीच्या सणाला गूळ आणि तीळांच्या गोड पदार्थांपासून भोगीच्या तिखट भाजी आणि तिळ लावलेल्या भाकरीच्या मेजवानीवर ताव मारायला आपण सगळेच सज्ज होतो.
स्निग्ध पदार्थांच्या जोडीला फळभाज्या, पालेभाज्यातून पाण्याचा अंश पोटात गेल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
या पदार्थांमधून प्रोटीन, काबोर्हायड्रेट्स आणि आयर्न या पोषणदव्यांचाही लाभ शरीराला मिळत .
**********
% भोगीची भाजी.. %
बनवण्यास वेळ :- १ ते १:३० तास .
* लागणारे जिन्नस :-
* तीळकूट करिता : -
१ कप पांढरे तिळ
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
१ चमचा लाल तिखट
१ वाटी कोरडा कढीपत्ता
१ चमचा गूळ
१ चमचा चिंच (मी कोकम वापरले)
१/४ कप किसलेले खोब
चवीपुरते मिठ.
* भाजी करिता :-
१ बटाटा
२ कोवळ्या शेवग्याच्या शेंगा
२ छोटी काटेरी वांगी
१ गाजर
१ वाटी मटार
१ वाटी मक्याचे दाणे किंवा कणसं
*वाल
*भिजवलेले मूग
*भिजवलेले चणे
(*मिळून १ वाटी)
भिजवलेले शेंगदाणे
अर्धा जूडी पालक
पाव जूडी Kale (मराठी शब्द?) ची भाजी
साखर
चवीप्रमाणे मिठ
१ टेबलस्पून लिंबू रस.
* फोडणी करिता :-
३ टेबलस्पून तेल / तूप
१/२ टीस्पून ओवा
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून मोहरी
१ बारिक चिरलेला कांदा.
* वाटणा करिता :-
१ कप खोबरे
१/२ टेबलस्पून जिरे
१/२ टेबलस्पून धणे
१/२ टेबलस्पून लाल मिर्ची पावडर
१/४ टीस्पून हळद
१/२/कप कोथिंबीर
१/२ इंच आलं
४-५ पाकळ्या लसूण
२-४ हिरव्या मिरच्या (तिखटाप्रमाणे)
२ ते २-१/२ टेबलस्पून चिंचेचा कोळ
१-२ टेबलस्पून काळा गोडा मसाला.
* पाक कॄती :-
* तीळकूट : -
तीळ प्रथम ३-४ मिनीटे भाजून घ्यावे. किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे. भाजलेल्या शेंगदाण्यांची साले काढून टाकावी. कढीपत्ता थोडा शेकवून घ्यावा म्हणजे तिळकूट टिकाऊ बनते. भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबरे, लाल तिखट, कोरडा कढीपत्ता, १ चमचा गूळ, कोकम आणि चवीपुरते मिठ एकत्र कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यावे. तीळकूट तयार.
* भाजी :-
सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात. साधारण मोठ्या फोडी ठेवाव्यात.
वाटण तयार करून घ्यावे.
मोठे पसरट भांडे घेउन तेल तापवून घ्यावे. त्यात हिंग, जिरे, मोहरी,ओवा आणि कांदा घालून परतून घ्यावे.
कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यात वाटण घालावे.
हळद, गोडा मसाला आणि तयार केलेले तीळकूट घालावे. तेल सूटेपर्यंत परतून घ्यावे.
चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात, वरून चिंचेचा कोळ ओतावा. ( चिंचेचा कोळ नसल्यास वाटणामध्ये ७ - ८ कोकम घातले तरी चालत.)
हे सर्व मंद आचेवर शिजू द्यावे, अर्धे शिजल्यावर त्यात मिठ, लिंबू रस घालावा. अधून-मधून ढवळत रहावे.
तयार झाल्यावर वरून कोथिंबीर आणि थोडे तीळ भूरभूरावेत.
सोबतीला बाजरीची भाकरी असल्यास उत्तम. दही भातात देखील घालून ही भाजी मस्त लागते किंवा नूसतीच भाजी देखील अप्रतीम लागते. विविध भाज्या आणि दाणे असल्याने प्रत्येक घासागणिक चव बदलते.
वाढणी: ४-६ व्यक्तींकरिता
* टीप :-
ह्या भाजीत आपण आवडीप्रमाणे यात भाज्या बदलू शकतो.
तीळ देखील काळे वापरलेले चालतील.
चणे काळे किंवा काबूली कूठलेही चालतील.
आलं-लसूण न घालताही ही भाजी करती येते.
+++++++++++++
* भोगीची भाजी - Bhogi Bhaji. *
वेळ :- पूर्वतयारी ३० मिनीटे.
पाकृसाठी :- १ तास लागतो.
वाढणी : - ३ ते ४ जणांसाठी.
* साहित्य :-
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड कप)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी (साधारण १ ते सव्वा कप मध्यम फोडी)
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप ओले चणे (मी फ्रोजन वापरले होते)
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे (२-३ तास भिजवणे)
१/४ कप पावट्याचे दाणे (ऐच्छिक)
६ तुकडे शेवगा शेंगेचे (३ इंचाचे तुकडे) (टीप)
फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
२ टिस्पून काळा मसाला - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ
१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ
१/४ कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ.
* कृती :-
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.
* टीप :-
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या आधी थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. परंतु भाज्या बाहेर शिजवल्यावर जो स्वाद येतो, तो कूकरमध्ये भाज्या शिजवल्यास येत नाही.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.